Sunday, July 31, 2011
Thursday, July 14, 2011


प्रिन्स खडकावर बसून समोर असलेल्या अथांग सागराकडे पाहत होता. सूर्य अस्ताला जात होता. पक्षी घराकडे परतत होते. समुद्राच्या लाटांचा मंद रव कानी पडत होता. इतक्यात तिने उसळी मारली आणि पाण्यातून बाहेर येऊन प्रिन्सच्या शेजारी येऊन बसली.
“किती उशीर? मला वाटलं आता आपली कधीच भेट नाही होणार.” प्रिन्स किंचीत रागावला.
“असं बोलू नकोस प्रिन्स. ते सत्य असलं तरी असह्य आहे.” ती म्हणाली.
“मत्स्यगंधा, तुझं नि माझं मिलन खरंच अशक्य आहे का?”
“तू हे का विचारतोयस प्रिन्स? तुला माहित्ये ना, तुझं आणि माझं विश्वं किती वेगळं आहे. तू मोकळ्या हवेशिवाय जगू शकत नाहीस. मी गहिऱ्या पाण्याशिवाय जगू शकत नाही.” मत्स्यगंधा त्याच्या बाहुपाशात विसावली.
“पण आपलं प्रेम आहे एकमेकांवर...”
“मला तुझ्या भावना कळतायत्, प्रिन्स. पण आपलं ‘असणं’ आपल्या प्रेमाच्या आड येतंय. तू आमच्या आयुष्यात आलास. त्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. पण मला तुझ्या प्रेमाच्या बंधनात नाही अडकता येणार, प्रिन्स. याचं शल्य जितकं तुला टोचतय तितकंच मलाही खुपतंय. मला तुझ्या प्रेमात आकंठ बुडण्याचा आनंद आता नाही घेता येणार कदाचित, पण तुझं प्रेम मला लाभलं या एका गोष्टीसाठी मी आयुष्यभर समाधानी राहीन.”
मत्स्यगंधेनं प्रिन्सचा अलगद मुका घेतला आणि त्या गडद पाण्यात ती लुप्त झाली














